“धरतीच्या कुशीमध्ये बीय बियानं निजली, वऱ्हे पसरली माती जशी शाल पांघरली..” – बहिणाबाई

    

बहिणाबाईचं ‘शेती व मानवी मन’ यांच्याशी असलेलं नातं अतूट होतं. पाण्याच्या उपलब्धतेनंतर शेतकऱ्याला नवनिर्मितीचे डोहाळे लागतात. कुणकवण गावाची गोष्टही अशीच आहे ...


        

           कुणकवण हे गाव देवगड तालुक्यात आहे. कुर्ली-सातंडी धरणाशेजारील या गावामध्ये विकासाचे वारे वाहत आहे. श्रीधर (अण्णा) तावडे ग्रामविकास संस्था व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून बायोगॅस, कुक्कुटपालन, हळद लागवड, सुरण लागवड हे प्रयोग यशस्वी झाल्यावर अजूनही काही करण्याची उमेद निर्माण झाली. गेल्या २ वर्षातील सर्व प्रक्रियेचे दृश्य परीणाम दिसू लागले आहेत .

         १० HP चा पंप, २ कि.मी लांबीची पाईप लाईन व पाण्याच्या उपलब्धतेमुळे या साऱ्या परिसरामध्ये शेवगा व खरबूज लागवडीचे प्रयोग आता होत आहेत. यावर्षी एकूण २० एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. चवळी, नाचणी, कुळीथ, वाली या पारंपारिक पिकांबरोबरच खरबूज (Musk Melon) व शेवगा (रोहित १) या पिकांची लागवड केली आहे.


 

         सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी श्री. मनोहर सावंत (सरपंच), श्री. सचिन राणे, श्री. रूपेश राऊत व सर्व ग्रामस्थांनी मेहनत घेतली. अभ्यासदौऱ्यानंतर श्री. हरेश जनक यांच्या नेतृत्त्वाखाली गावातील राबणारे हात एकत्र आले. प्लास्टिक मल्चिंग, खतांचा योग्य संतुलित वापर, ठिबक सिंचन या साऱ्या गोष्टी शेतकऱ्यांनी समजून घेतल्या. श्री. संतोष राणे, श्री. हरीश्चंद्र गुरव, श्री. मोहन कदम, श्री. सिद्धेश जनक, श्री. जितेंद्र कदम हे शेतकरी नेहमी लागवडीवर जातीने लक्ष देऊन असतात. या लागवडीमध्ये जनक, जाधव, रावराणे, कदम या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. भविष्यामध्ये समूह शेतीचा मोठा प्रयोग अशाप्रकारच्या सामंजस्यातून व श्रमविभागणीतून होऊ शकतो.


 

अजून २ महिन्यांनी शेवग्याच्या शेंगा लागतील. विक्रीसाठी बाजारपेठही शोधली आहे. कोकणातील शेतकरी लाल मातीत असे नवनवीन प्रयोग करत आहेत. यातूनच विकासाच्या नव्या पायवाटा तयार होतील असा विश्वास सर्वांना वाटत आहे.