मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत वेताळ बांबर्डे गावात आधुनिक स्वच्छता गृह उभारण्यात आले आहे. हे केवळ एक बांधकाम नसून गावाच्या स्वच्छतेबाबतची जाणीव आणि एकत्रित इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. लोकांनी ठरवले तर सारे शक्य आहे, याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या गावासोबत सातत्याने कार्यरत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून लवकरच दहा बायोगॅस प्रकल्प सुरु होणार आहेत. यामुळे गावातील शेणाचे आणि घरगुती जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन तर होईलच, पण पर्यावरणपूरक उर्जेचाही उपयोग ग्रामस्थांना होणार आहे.
गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे. यामध्ये सुदृढ वासरू स्पर्धा, पर्यावरणपूरक आकाश कंदील स्पर्धा, तसेच मंदिर परिसरातील फुलझाडे लावण्याचे अभियान हे उपक्रम विशेष ठरणार आहेत.
याशिवाय, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गांडूळ खत प्रकल्प आणि डिजिटल शाळा यासारखे नवनवीन प्रकल्प राबवण्याचे नियोजन केले जात आहे. शेती, शिक्षण, संस्कृती आणि पर्यावरण या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती घडवून वेताळ बांबर्डे हे गाव आदर्श ग्राम होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.