UPNRM प्रकल्पाचा ठसा – एक शाश्वत विकासाचा प्रवास

    
|

UPNRM प्रकल्पाचा ठसा – एक शाश्वत विकासाचा प्रवास

दहा वर्षांपूर्वी संपलेला UPNRM म्हणजेच Umbrella Programme for Natural Resource Management हा प्रकल्प GIZ (जर्मनी)KfW बँक यांच्या सहकार्याने नाबार्डमार्फत सुरू झालेला हा उपक्रम. हा प्रकल्प भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये प्रभावीरीत्या राबवला गेला. काल, या प्रकल्पाच्या परिणामांचा (Impact Assessment) अभ्यास करण्यासाठी थेट जर्मनीहून एक अभ्यास गट आलं होतं. सोबत नाबार्ड, पुणे येथील श्री. कुंभारे सर देखील उपस्थित होते.

सुमारे सात कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये राबवण्यात आला. भगीरथ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि जिल्हा परिषद यांची सक्रिय भागीदारी यात होती.


UPNRM1 

निवजे गावातील भेट

या अभ्यास भेटीसाठी निवडलेलं गाव होतं निवजे. गावातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवातून हा प्रकल्प त्यांच्या जीवनात कसा सकारात्मक बदल घडवतो, याबद्दल थेट माहिती दिली. बायोगॅस, म्हैसपालन, हळद लागवड आणि दूध संकलन केंद्र यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून या गावाने खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारला आहे.

स्थानिक पर्यायांमधून जागतिक दृष्टीकोन

हा प्रकल्प होता क्लायमेट चेंज मिटिगेशनचा – सध्या संपूर्ण जगात चर्चेचा विषय असलेल्या पर्यावरणीय बदलांशी संबंधित.

या प्रकल्पातून बायोगॅसच्या वापराने स्वयंपाकाच्या इंधनासाठी जंगलांवरचा दबाव कमी झाला. कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसायाने शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा पर्याय मिळाला. सेंद्रिय शेतीचा अंगीकार केल्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाला. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे कार्बन उत्सर्जनात मोठी घट. सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन वाहतुकीतून होतं, तेव्हा स्थानिक संसाधनांचा उपयोग करताना योग्य विज्ञान दृष्टिकोन ठेवल्यास – ‘छोटे प्रयोग मोठा परिणाम’ या सिद्धांताची प्रचिती येते.


UPNRM2 

भगीरथ प्रतिष्ठानचा मूक पण प्रभावी प्रवास

आजवर भगीरथ प्रतिष्ठानने सुमारे १०,००० बायोगॅस प्लांट्स यशस्वीरित्या बांधले आहेत. आज संस्थेचे कार्य देश-विदेशात चर्चेचा विषय आहे. मात्र स्थानिक पातळीवर नागरिकांना कधी कधी याची कल्पनाही नसते. 'आम्ही प्रचार-प्रसाराच्या मागे न लागता, काम करत राहतो. जेव्हा वेळ येईल तेव्हा लोकांना समजेल, हा आमचा विश्वास' असे भगीरथ प्रतिष्ठानचे प्रांजळ म्हणणे आहे.

जिज्ञासेचे सामर्थ्य आणि शाश्वततेचा पाया

कालच्या चर्चेत त्या जर्मन मॅडमनी ज्या जिज्ञासेने प्रश्न विचारले, त्यातून बरेच काही शिकायला मिळालं. सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत झालेल्या या सत्रात प्रकल्पाच्या दीर्घकालीन परिणामांवर चर्चा झाली. शाश्वत विकास फक्त सुविधा निर्माण करून होत नाही; तर विज्ञान, अभ्यास, प्रश्नोत्तरे आणि स्वतःचा शोध यातून तो घडतो.

"विकसित" हा शब्द ऐकायला सोपा आहे, पण तो घडवायचा असेल, तर त्यामागे एक वैचारिक दृष्टी, चिकाटी, सातत्य आणि समुदायाचा सहभाग असतो. हे आपण या जर्मन शिष्टमंडळाच्या भेटीतून पुन्हा एकदा समजून घेतलं.

एका लहान गावात, वर्षानुवर्षं सुरू असलेल्या प्रयोगांमुळे जेव्हा दूरदेशातून अभ्यासक भेट देतात, तेव्हा आपल्याला समाधान वाटतं. हा केवळ प्रकल्प नाही आहे – ह्याच्याकडे एक विचार, एक दृष्टिकोन, आणि भविष्यासाठी दिलेलं योगदान असे बघणेच सर्वात संयुक्तिक ठरेल.